मानवत (वार्ताहर) : येथील के.के.एम. महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागामार्फत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. विद्यार्थ्यांच्या ज्ञानाला चालना मिळावी, स्पर्धात्मक वृत्ती वाढावी तसेच बौद्धिक क्षमतेला वाव मिळावा या उद्देशाने प्रश्नमंजुषा, निबंध स्पर्धा, व्याख्याने आदी उपक्रम सातत्याने राबविले जातात.
याच पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विशेष प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आला :
प्रथम क्रमांक – दिशा शिवाजी पाईकराव
द्वितीय क्रमांक – वैष्णवी आदेश धर्माधिकारी
तृतीय क्रमांक – शेख सबा पाशा, अशोक दीपक शहाणे
विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र तसेच भारतीय संविधानाची प्रत देऊन गौरविण्यात आले.
या पारितोषिक वितरण समारंभास संस्थेचे सहसचिव विजयकुमार दलाल, संचालक दिलीप हिबारे, संचालक डॉ. संजय लढा, प्राचार्य डॉ. भास्कर मुंडे, उपप्राचार्य डॉ. के. जी. हुगे, प्राचार्य डॉ. नागनाथ कदम तसेच राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. पंडित मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा अभ्यास करून शिक्षणाच्या माध्यमातून प्रगती साधावी, असे आवाहन केले. तसेच विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे आयोजन राज्यशास्त्र विभागाने यशस्वीरीत्या केले असून विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली.






