अतनूर, जळकोट (प्रतिनिधी) – नागरिकांचे आरोग्यमान उंचावण्यासाठी शासनाने राबविलेल्या ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ या महत्त्वाकांक्षी अभियानाची सुरुवात दि. १ मे, महाराष्ट्र दिनानिमित्त अतनूर येथे करण्यात आली.
गावातील प्रत्येक नागरिकाला घराजवळच आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे, प्रतिबंधात्मक व प्रोत्साहनात्मक आरोग्यसेवा वाढवणे, जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवणे आणि लोकसहभागातून आरोग्य व्यवस्थेला बळकट करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमात ग्रामपंचायत ही केंद्रबिंदू म्हणून कार्यरत राहणार आहे.
या कार्यक्रमास प्राथमिक आरोग्य केंद्र अतनूर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. सकलेन शेख, डॉ. भक्ती कोळळे, आरोग्य सहाय्यिका प्रेमिला म्हेत्रे, आरोग्य सहाय्यक बालाजी सोनटक्के, आरोग्य निरीक्षक शेख सलमान, फार्मसिस्ट गजानन तोंडारे, वरिष्ठ लिपिक पांडुरंग सूर्यवंशी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
तसेच शासननियुक्त ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य तथा दलितमित्र बालासाहेब गोविंदराव शिंदे, ग्राहक जनजागरण व मार्गदर्शन संस्थेचे संस्थापक बी. जी. शिंदे, जिजामाता महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. संध्या शिंदे, वसुंधरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. रुक्मिणीबाई सोमवंशी यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते, आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्त्या व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
● समित्यांची स्थापना
या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तालुका स्तरावर समिती स्थापन करण्यात आली आहे. गटविकास अधिकारी हे या समितीचे अध्यक्ष असून ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, बालविकास प्रकल्प अधिकारी, पाणीपुरवठा विभाग, तालुका विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी तसेच स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांचा यात समावेश आहे.
यासोबतच ग्रामपंचायत पातळीवरही कृती समिती स्थापन करून गावागावांत आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे.








