अतनूर, जळकोट (प्रतिनिधी) – जळकोट तालुक्यातील अतनूर येथे महाराष्ट्र दिन, आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि बौद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली.
या निमित्ताने प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच विविध शाळा व महाविद्यालयांच्या प्रांगणात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे श्रमाचा गौरव करत महिला कामगार व असंघटित बांधकाम कामगार यांच्या हस्ते ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच चंद्रशेखर पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले.
यानंतर गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, अण्णाभाऊ साठे आणि महात्मा गांधी यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून बुद्ध वंदना घेण्यात आली.
● मान्यवरांचे विचार
सरपंच चंद्रशेखर पाटील यांनी महाराष्ट्र दिनाचे महत्त्व स्पष्ट करत मराठी भाषा ही केवळ भाषा नसून आपली ओळख आणि संस्कृती असल्याचे सांगितले.
अखिल भारतीय महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार व कर्मचारी काँग्रेसचे राज्य समन्वयक एस. जी. शिंदे-पाटील आणि राष्ट्रीय मजदूर संघाचे मराठवाडा अध्यक्ष बालासाहेब गोविंदराव शिंदे यांनी कामगार दिनाचे महत्त्व अधोरेखित करत कामगारांच्या हक्कांबाबत जागरूकता निर्माण करण्याचे आवाहन केले.
तसेच बौद्ध पौर्णिमेनिमित्त भगवान गौतम बुद्ध यांच्या करुणा, समता आणि अहिंसेच्या विचारांना उजाळा देत “अप्प दीपो भव” हा संदेश आजही मार्गदर्शक असल्याचे सांगण्यात आले.
● उपस्थिती
या कार्यक्रमास ग्रामसेवक फिरोज शेख, माजी सैनिक इस्माईल मुंजेवार, सेवानिवृत्त मुख्याध्यापक बाबुराव पंचगल्ले, वैद्यकीय अधिकारी डॉ. सकलेन शेख, डॉ. भक्ती कोळ्ळे, तसेच विविध सामाजिक कार्यकर्ते, आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्त्या व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमामुळे अतनूर परिसरात देशभक्ती, सामाजिक जागर आणि अध्यात्मिक वातावरण निर्माण झाले.







