पालकमंत्र्यांनी घेतला पोलिस विभागाचा आढावा
प्रतिनिधी
वर्धा, दि. २ (जिमाका ) : गुन्हेगारांना जरब बसेल आणि सामान्य नागरिक सुरक्षित राहील ही आमची प्राथमिकता आहे. बदलत्या गुन्हेगारी पद्धती लक्षात घेता पोलिस यंत्रणाही तितकीच सक्षम असणे आवश्यक आहे. पुढील काळात तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून पोलिस प्रशासन अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येत असल्याचे गृह (ग्रामीण) राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी सांगितले.
पोलिस अधीक्षक कार्यालयात गेल्या वर्षभरात केलेल्या कामकाजाचा आढावा पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी घेतला. जिल्हाधिकारी वान्मथी सी, पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपअधिक्षक पुंडलिक भटकर यांच्यासह पोलिस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील प्रत्येक शहरात पोलिस विभागामार्फत सीसीटीव्ही प्रकल्प राबविण्यात आले आहेत. उर्वरित दोन-तीन शहरांमध्येही काम प्रगतीपथावर आहे. गुन्हेगारांकडून होणारा तंत्रज्ञानाचा वापर पाहता, पोलिस विभागानेही तितक्याच आधुनिक पद्धतीने सज्ज राहावे. गुन्ह्यांची उकल करण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा उपयुक्त ठरत असून गुन्हे प्रतिबंध आणि तपास कार्य अधिक परिणामकारक करण्याच्या सूचना पालकमंत्री डॉ. भोयर यांनी दिल्या.
जिल्ह्यात नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मागील आठ ते दहा वर्षांत विविध उपक्रम राबविण्यात आले. जिल्ह्यातील दारूबंदीच्या विषयावर बोलताना स्पष्ट करण्यात आले की, जिल्ह्याची ही परंपरा कायम राखण्यासाठी शासन सकारात्मक आहे. मात्र, केवळ कागदोपत्री बंदी न राहता तिची प्रत्यक्ष आणि कडक अंमलबजावणी व्हावी, यासाठी विशेष मोहिमा राबविण्यात याव्यात. लोकांच्या भावना लक्षात घेऊन या विषयात प्रशासनाने अधिक संवेदनशीलपणे काम करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येकडेही लक्ष वेधण्यात आले. अनेक रस्ते अरुंद असताना त्यावर वाढलेले अतिक्रमण नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. अतिक्रमण हटविण्यासाठी प्रशासनाने ठोस कारवाई करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. नागरिकांची सुरक्षितता, पर्यावरणपूरक उपक्रम आणि शिस्तबद्ध शहरी व्यवस्थापन यासाठी जिल्हा प्रशासनाने समन्वयाने काम करण्याची गरज आहे. सुधारित निकषावर पोलिस पदभरती, वाहने, नवीन पोलिस स्टेशन इमारत, पोलिस वसाहत आदी प्रलंबित प्रकरणांबाबत लवकरच बैठक आयोजित करण्यात येईल, असे पालकमंत्री म्हणाले.
यावेळी प्रसारमाध्यम प्रतिनिधीनी शहरातील अवजड वाहतूक, अवैध दारू विक्री, सुगंधित तंबाखू, रेन वॉटर हार्वेस्टिंग आदीबाबत पालकमंत्री डॉ. भोयर यांना माहिती दिली. वर्ध्याचा विकास करताना सुरक्षा, तंत्रज्ञान आणि पर्यावरण यांचा समतोल राखणे ही आमची प्राथमिकता आहे. नवीन उभारण्यात येणाऱ्या सर्व शासकीय इमारतीवर रेन वॉटर हार्वेस्टिंग सक्तीचे करण्यात येणार असून जिल्हाधिकारी कार्यालयात याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. आपणाकडे असणारी माहिती द्या त्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधतांना आश्वस्त केले.







