मुरूम (प्रतिनिधी) : उमरगा तालुक्यातील मुरूम व परिसरातील वाढत्या वीज समस्येवर तोडगा काढण्यासाठी नगर परिषद कार्यालयात दि. २ मे रोजी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत स्थानिक आमदार प्रवीण स्वामी उपस्थित राहून समस्यांवर तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश महावितरण अधिकाऱ्यांना दिले.
नगरपालिका सभागृहात झालेल्या बैठकीत शेतकरी व नागरिकांनी वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. सततच्या विजेच्या चढ-उतारामुळे विद्युत मोटारी जळत असून, यामुळे पिकांचे व आर्थिक नुकसान होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
यावेळी आमदार प्रवीण स्वामी यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत निर्देश देत नागरिकांच्या तक्रारी तातडीने सोडवाव्यात, तसेच प्रलंबित प्रश्नांवर वेळेत कार्यवाही करावी, असे सांगितले. “नागरिकांना होणारा त्रास थांबवणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. तसेच महावितरणसमोरील अडचणींचा आढावा घेऊन त्यावर तोडगा काढण्याचेही आश्वासन दिले.
बैठकीदरम्यान काही तक्रारींचे तत्काळ निवारण करण्यात आले, तर उर्वरित प्रश्नांवर लवकरच ठोस कार्यवाही करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या :
- मुरूम शहरासाठी स्वतंत्र १३३ केव्ही उपकेंद्र सुरू करावे
- उच्च दाबाने वीजपुरवठा करावा
- वागदरी ते आलूर वीजवाहिनीचे रखडलेले काम तातडीने सुरू करावे
- केसर जवळगा येथे एक दिवसाआड होणारा वीजपुरवठा नियमित करावा
- शेतीसाठी किमान सहा तासांचा अखंडित वीजपुरवठा द्यावा
या बैठकीला शिवसेना (उभा टा) उपजिल्हाप्रमुख बसवराज वरनाळे, महावितरणाचे अभियंते, कनिष्ठ अभियंता सचिन मुरूम, गणेश शेबाडकर, तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी व शेतकरी नेते उपस्थित होते. बेळंब, मुरूम, केसर जवळगा परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपापल्या समस्या मांडल्या.
दरम्यान, मुरूम शहरात प्रथमच अशा प्रकारे बैठक घेऊन थेट शेतकऱ्यांशी संवाद साधल्याबद्दल आमदार प्रवीण स्वामी यांचे उपस्थितांनी आभार मानले.











