किनवट (प्रतिनिधी) : भारत सरकारच्या महत्त्वपूर्ण जनगणना 2027 उपक्रमाअंतर्गत किनवट शहरात स्वगणना (Self Enumeration) प्रक्रियेला उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ करण्यात आला. या मोहिमेचा शुभारंभ शहराच्या प्रथम नागरिक तथा नगराध्यक्ष सौ. सुजाताताई विनोद यंड्रलवार यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला नगराध्यक्षांनी स्वतः स्वगणना करून या प्रक्रियेला प्रत्यक्ष प्रारंभ केला. यावेळी त्यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, “स्वगणना ही आधुनिक, सोपी आणि पारदर्शक पद्धत असून प्रत्येक नागरिकाने यात सक्रिय सहभाग नोंदवून अचूक माहिती द्यावी. यामुळे शहराच्या विकासासाठी योग्य नियोजन करणे सुलभ होईल.”
स्वगणनेचा कालावधी दिनांक ०१ मे २०२६ ते १५ मे २०२६ असा निश्चित करण्यात आला असून, या कालावधीत नागरिकांनी https://se.census.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन स्वतःची माहिती भरावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून नागरिकांना घरबसल्या सहजपणे माहिती नोंदविता येणार आहे.
स्वगणना ही जनगणना प्रक्रियेतील एक महत्त्वाची पायरी मानली जाते. यामध्ये नागरिक स्वतःची वैयक्तिक, कुटुंबीय व सामाजिक माहिती अचूकपणे नोंदवतात. त्यामुळे शासनाला लोकसंख्येचे अचूक आकडे, सामाजिक रचना, शैक्षणिक व आर्थिक स्थिती यांचा अभ्यास करून विकासात्मक योजना आखणे अधिक सोपे होते.
या प्रसंगी मुख्याधिकारी श्री मुगाजी काकडे, नगरपरिषद किनवटचे सर्व नगरसेवक, तसेच अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित अधिकाऱ्यांनी स्वगणना प्रक्रियेचे महत्त्व, माहिती भरण्याची पद्धत तसेच अचूक माहिती देण्याची आवश्यकता याबाबत नागरिकांना मार्गदर्शन केले.
नगरपरिषद किनवटतर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, स्वगणना प्रक्रियेत उत्स्फूर्त सहभाग घेऊन प्रामाणिक व अचूक माहिती नोंदवावी. यामुळे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेले नियोजन अधिक प्रभावीपणे करता येणार असून, शासकीय योजनांचा लाभही अधिक योग्य पद्धतीने मिळू शकणार आहे.











