रिसोड (प्रतिनिधी):
जनगणना-२०२७च्या पार्श्वभूमीवर रिसोड नगर परिषद यंत्रणा सज्ज झाली असून जनगणनेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी व लोकप्रतिनिधींचे सहकार्य मिळवण्यासाठी नगरपरिषदेत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ही बैठक दिनांक १ मे २०२६ रोजी नगर परिषद अध्यक्ष भगवानदादा क्षिरसागर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली.
बैठकीत अध्यक्ष भगवानदादा क्षिरसागर यांनी जनगणनेचे राष्ट्रीय महत्त्व अधोरेखित करत सर्व लोकप्रतिनिधींनी या कार्यात सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन केले. त्यांनी स्वतः संकेतस्थळावरून स्व-गणना पूर्ण करून नागरिकांना या राष्ट्रीय उपक्रमात सहभागी होण्याचेही आवाहन केले.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा चार्ज जनगणना अधिकारी सतीश शेवदा उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, जनगणना ही देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून त्याद्वारे मिळणारी माहिती विकास योजना आखणे, लोकशाही प्रतिनिधित्व निश्चित करणे आणि विविध कल्याणकारी योजना राबवण्यासाठी उपयुक्त ठरते. त्यामुळे नागरिकांनी अचूक माहिती नोंदविणे आवश्यक आहे.
जनगणना-२०२७ ही पूर्णपणे डिजिटल पद्धतीने पार पडणार असून माहितीची गोपनीयता व सुरक्षितता यावर विशेष भर देण्यात येणार आहे. जनगणना दोन टप्प्यांत होणार असून—
- पहिला टप्पा (घर यादी गणना): १६ मे २०२६ ते १४ जून २०२६
- स्व-गणना कालावधी: १ मे ते १५ मे २०२६
- दुसरा टप्पा (व्यक्ती गणना): पुढील नियोजनानुसार पार पडणार
रिसोड शहरातील जनगणना सुरळीत पार पाडण्यासाठी नगर परिषदेमध्ये स्वतंत्र जनगणना कक्ष स्थापन करण्यात आला आहे. यासाठी ७० प्रगणक आणि १२ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून संपूर्ण प्रक्रियेवर बारकाईने देखरेख ठेवली जाणार आहे.
बैठकीत प्रगणकांकडून विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची सविस्तर माहिती लोकप्रतिनिधींना देण्यात आली. नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी लोकप्रतिनिधींची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.
बैठकीचे प्रास्ताविक प्रशासकीय अधिकारी तथा अतिरिक्त चार्ज जनगणना अधिकारी शिवनंदन बरडे यांनी केले. यावेळी नगर परिषद विषय समितीचे सभापती, सदस्य व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
📊 नागरिकांनी स्व-गणना प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवून अचूक माहिती देण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.










