मारेगाव (प्रतिनिधी) : मारेगाव येथील मार्डी चौकात मध्यरात्री उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रशासनाने हटवल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी ५२ शिवप्रेमींवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३० मे रोजी मध्यरात्री काही शिवप्रेमींनी चौकात पुतळा बसविला होता. त्यानंतर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने तो पुतळा हटविण्याची कारवाई केली. मात्र या कारवाईमुळे स्थानिकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.
“पुतळा बसविताना प्रशासन कुठे होते? आणि आता शिवप्रेमींवरच कारवाई का?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. पुतळा हटवल्यानंतर अनेकांनी भावना व्यक्त करत प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला असून प्रशासनाकडून शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या घटनेनंतर संपूर्ण तालुक्यात तणावाचे वातावरण कायम असल्याचे दिसून येत आहे.









