अहेरी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने सुरू केलेल्या ‘कॉपीमुक्त अभियान’ाबाबत आता विविध स्तरांतून प्रश्न उपस्थित होत असून या उपक्रमावर टीकेची झोड उठत आहे. समाजात या अभियानामागील उद्देश सकारात्मक असला तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीत अनेक त्रुटी असल्याची चर्चा सुरू आहे.
पालक व विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, परीक्षेदरम्यान कडक निर्बंधांमुळे विद्यार्थ्यांवर मानसिक ताण वाढत असल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी मात्र नियमांचे पालन न होता शिक्षकांकडून सांकेतिक पद्धतीने मदत दिल्याच्या चर्चाही दबक्या आवाजात होत आहेत.
तसेच काही परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार होत असल्याच्या चर्चांमुळे ‘कॉपीमुक्त अभियान’ केवळ दिखाऊ असल्याचा आरोप केला जात आहे. स्पर्धात्मक परीक्षांच्या पार्श्वभूमीवर १०वी व १२वीच्या परीक्षांमध्ये एवढी कडक भूमिका का घेतली जाते, असा सवालही नागरिक उपस्थित करत आहेत.
परीक्षा केंद्रातील एखाद्या पर्यवेक्षकाच्या चुकीसाठी केंद्रप्रमुखांवर कारवाई करण्याच्या पद्धतीवरही नाराजी व्यक्त होत आहे. यामुळे शिक्षकांचा मनोबल खच्ची होत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, अनेक शाळा व महाविद्यालयांमध्ये शिक्षकांची कमतरता, काही ठिकाणी विनावेतन काम करणारे शिक्षक अशा मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची खंतही व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे लक्ष देऊन शिक्षण व्यवस्थेतील मूलभूत प्रश्न सोडवावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.










