पनवेल (साईनगर) : गौरवशाली सनातन संस्कृतीचे रक्षण आणि भावी पिढीमध्ये स्वाभिमानाची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने ३ मे २०२६ रोजी सायंकाळी हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास परिसरातील महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग लाभला असून उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रम पार पडला.
या संमेलनात ऐतिहासिक शस्त्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यामुळे नव्या पिढीला इतिहासाची ओळख आणि परंपरेचे महत्त्व समजण्यास मदत झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची आठवण करून देणाऱ्या विविध सांस्कृतिक उपक्रमांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमादरम्यान बालकलाकारांनी पारंपरिक वेशभूषेत नृत्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली. तसेच बजरंग बल संस्थेचे संस्थापक गुरुनाथ मुंबईकर यांनी स्वसंरक्षणाचे महत्त्व पटवून दिले. “आजच्या काळात स्वसंरक्षण ही गरज आहे,” असा संदेश त्यांनी दिला.
विशेष आकर्षण म्हणून मुलींनी लाठी, तलवार आणि दांडपट्टा यांचे प्रात्यक्षिक सादर केले. “प्रत्येक मुलगी ही जिजाऊंची लेक आणि शिवकन्या आहे,” हा संदेश देत त्यांनी आत्मविश्वास आणि धाडसाचे दर्शन घडवले.
कार्यक्रमाच्या शेवटी महाराष्ट्र राज्य गीत आणि शिवगर्जना देऊन महाराजांना मानवंदना अर्पण करण्यात आली. अशा प्रकारच्या सांस्कृतिक उपक्रमांमुळे तरुण पिढीमध्ये देशभक्ती, स्वाभिमान आणि एकतेची भावना दृढ होत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.











