वैजापूर | प्रतिनिधी:
महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेताना वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना नाहक आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शासनाने नियुक्त केलेल्या कंत्राटदार कंपन्यांकडून शेतकऱ्यांची सर्रास लूट सुरू असून, प्रशासकीय अधिकाऱ्यांचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.
स्वतःच्या खर्चाने वाहतूक आणि साहित्य
शासकीय नियमांनुसार (GR), सौर पंप बसवण्यासाठी शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क घेता येत नाही. मात्र, वैजापूर तालुक्यात परिस्थिती अगदी उलट आहे. कंपन्यांचे प्रतिनिधी सौर प्लेट्स शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचवण्याऐवजी, शेतकऱ्यांनाच स्वतःच्या खर्चाने खासगी वाहने भाड्याने करून साहित्य नेण्यास भाग पाडत आहेत. इतकेच नव्हे तर, सौर प्लेट्स बसवण्यासाठी लागणारी वाळू, सिमेंट, खडी आणि खड्डे खोदण्याचा खर्चही शेतकऱ्यांच्याच खिशातून जात आहे.
कमिशनखोरीचा सुळसुळाट
सोलर बसवण्यासाठी येणारे तंत्रज्ञ आणि कर्मचारी कामाच्या बदल्यात शेतकऱ्यांकडे १,००० ते २,००० रुपयांची उघड मागणी करत आहेत. पैसे न दिल्यास काम रेंगाळले जाते किंवा तांत्रिक त्रुटी काढल्या जातात, अशा तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत. आधीच नैसर्गिक संकट आणि कर्जबाजारीपणामुळे मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत असताना, दुसरीकडे सरकारी योजनेच्या नावाखाली होणारी ही लूट संतापजनक आहे.
अधिकाऱ्यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष?
या सर्व गैरप्रकारांची माहिती स्थानिक प्रशासनाला नाही की ते मुद्दाम डोळेझाक करत आहेत, असा सवाल आता समस्त वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून होत आहे











