लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यात अलीकडेच एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या पक्षप्रवेशानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषद घेत आपली पुढील राजकीय भूमिका स्पष्ट केली.
या वेळी विनायकराव पाटील (माजी राज्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट) यांनी बोलताना लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पक्षविस्ताराचा मानस व्यक्त केला. “लवकरच सुमारे २५ हजार कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश होणार असून गाव तेथे शिवसेनेच्या शाखा सुरू करून संघटना मजबूत केली जाईल,” असे त्यांनी सांगितले.
तसेच ॲड. गणेश गोमचाळे (माजी जिल्हाध्यक्ष, भाजपा युवा मोर्चा) यांनी युवकांना शिवसेनेत सहभागी करून महानगरपालिका पातळीवर संघटन उभारणी करण्यावर भर दिला जाईल, असे नमूद केले.
या वेळी संतोष सोमवंशी (शिवसेना – उबाठा गट), नवनाथ भोसले (भाजपा) तसेच संदीप पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.
पत्रकार परिषदेच्या निमित्ताने लातूर शहरात विनायकराव पाटील यांचे शिवसेनेच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. या प्रसंगी शिवसेना, युवा सेना, महिला आघाडी, सामाजिक न्याय विभाग, कामगार सेना, वाहतूक सेना, किसान सेना यांसह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.
कार्यक्रमात नव्याने प्रवेश केलेल्या तसेच आजी-माजी कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. या घडामोडींमुळे लातूर जिल्ह्यातील राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे.











