धारणी, 4 मे : धारणी तालुक्यातील नारदू गावातील आदिवासी युवकाचा मृतदेह रेहटा गावाजवळ नाल्याशेजारी रविवारी आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. श्यामलाल साबुलाल मावस्कर (वय 32) असे मृताचे नाव असून तो गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता होता.
मिळालेल्या माहितीनुसार, 30 एप्रिल रोजी श्यामलाल गावात दिसून आला होता. मात्र त्यानंतर तो घरी परतला नाही. कुटुंबीयांनी शोधाशोध करून पोलिसांना माहिती दिली होती. अखेर 4 मे रोजी रेहटा गावाजवळ नाल्याशेजारी त्याचा मृतदेह आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच धारणी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक अवतारसिंह चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल शंकरलाल कास्देकर, PSI चिमटे आणि ASI पाटील यांनी पंचनामा केला. मृतदेहाची अवस्था पाहता जागेवरच प्राथमिक कार्यवाही करून शवविच्छेदन करण्यात आले.
पोलीस सूत्रांनुसार, हा मृत्यू दुचाकी अपघातात झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मृताची दुचाकीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. मात्र, नातेवाईकांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी केली आहे.
श्यामलाल हा कुटुंबातील मुख्य कमावता सदस्य असल्याने त्याच्या निधनामुळे कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे. पोलिसांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.









