परळी (प्रतिनिधी) : परळी तालुक्यातील पांगरी येथील ओंकार शुगर्स साखर कारखान्याकडून जानेवारी ते मार्च दरम्यानच्या गाळपाचे ऊस बिल अद्याप न मिळाल्याने संतप्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मंगळवारी (दि. ५ मे) कारखान्यावर धडक देत जोरदार निदर्शने केली. ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.
गेल्या चार महिन्यांपासून केवळ आश्वासने देत वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी यावेळी केला. थकीत ऊस बिलासोबतच वाहतूक खर्च आणि तोडणी मजुरांची मजुरीही प्रलंबित असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
यावेळी शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासन आणि कारखाना व्यवस्थापनाचा तीव्र निषेध व्यक्त केला. “येत्या तीन दिवसांत सर्व थकीत देयके अदा न झाल्यास ८ मे रोजी कारखान्याला टाळे ठोकण्यात येईल,” असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.
भर उन्हात पार पडलेल्या या आंदोलनात ॲड. अजय बुरांडे, मुरलीधर नागरगोजे यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते. वारंवार निवेदने देऊनही कारखाना प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शेतकऱ्यांनी स्पष्ट केले की, ऊस देयके वेळेत न मिळाल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले असून, तात्काळ देयके मिळाली नाहीत तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.











