किनवट (प्रतिनिधी) : किनवट व गोकुंदा परिसरातील विविध भागांत वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून, या पार्श्वभूमीवर भाजप नगरसेवक श्रीनिवास नेम्माणीवार यांनी किनवट येथील महावितरण कार्यालयात धडक देत निवेदन सादर केले.
सुभाष नगर, समता नगर, व्हीआयपी कॉलनी, साठे नगर, मोमिन पुरा, इस्लाम पुरा, भोईगल्ली, पेटकुले नगर, बिलाल नगर, हबीब कॉलनी, अंगणवाडी परिसर आदी भागांत दिवस-रात्र वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. या सततच्या ‘वीज लपंडावा’मुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास बाधित होत असून, डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. तसेच वीजेवर अवलंबून असलेल्या छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचेही मोठे नुकसान होत आहे.
महावितरण विभागातील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप करत नेम्माणीवार यांनी अधिकाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. “वीज लपंडाव त्वरित थांबवून सुरळीत वीजपुरवठा करण्यात यावा, अन्यथा नागरिकांच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडले जाईल,” असा इशारा त्यांनी दिला.
तसेच महावितरणने नागरिकांच्या तक्रारींकडे गांभीर्याने लक्ष देत तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.











