देवळी (प्रतिनिधी )
इंझाळा परिसरात वादळी वाऱ्यामुळे रस्त्यावर पडलेले झाड अद्याप हटविण्यात न आल्याने अपघाताचा धोका वाढला असून प्रशासनाच्या निष्क्रियतेबद्दल नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. ५ मे २०२६ रोजी रात्री सुमारे ११.३० वाजता विजयागोल–इंझाळा मार्गावर रस्त्यावर पडलेल्या झाडामुळे एका व्यक्तीचा अपघात झाला. तीन दिवसांपूर्वी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेले झाड कोसळून थेट रस्त्यावर पडले आहे. मात्र अद्याप कोणत्याही संबंधित विभागाने ते हटविण्याची तसदी घेतलेली नाही.
पुलगाव–शिरपूर हा मार्ग आधीच धोकादायक बनला असून, निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्त्याची अवस्था खराब झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना वाहने चालवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या मार्गावर वारंवार अपघात होत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत यापूर्वी अनेक आंदोलने झाली असली तरीही संबंधित बांधकाम विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. तसेच विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान रस्ता दुरुस्तीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. मात्र अद्यापही परिस्थितीत सुधारणा झालेली नाही.
रस्त्यावर पडलेले झाड तातडीने हटवावे आणि पुलगाव–शिरपूर मार्गाचे दर्जेदार काम करून नागरिकांच्या जीविताचे रक्षण करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.










