भडगाव (प्रतिनिधी) – भोर तालुक्यातील नसरापूर येथे घडलेल्या तीन वर्षीय बालिकेवरील अत्याचार व खून प्रकरणाच्या निषेधार्थ भडगाव येथे तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समिती यांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देऊन आरोपीला तातडीने मृत्युदंड देण्याची मागणी करण्यात आली.
निवेदनात नमूद करण्यात आले की, भिमाजी कांबळे याने अल्पवयीन वेदवती कुलकर्णी हिच्यावर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याचा आरोप आहे. तसेच घटनेनंतर मृतदेह लपवल्याचा उल्लेखही निवेदनात करण्यात आला आहे.
समितीने या प्रकरणात जलदगती न्यायालयात तातडीने सुनावणी घेऊन आठ दिवसांत निकाल लावावा आणि आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर कायदेशीर कारवाई आवश्यक आहे. तसेच प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
या निवेदनावर बाळकृष्ण टोनगावकर, विजय देशपांडे, रवी कुलकर्णी, उदय देशमुख, योगेश दीक्षित, बापू व्यवहारे, शशी निशाणदार, संजय जोशी यांसह अनेक पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
दरम्यान, या प्रकरणामुळे परिसरात संतापाची लाट असून नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.









