उदगीर | प्रतिनिधी
उदगीर व जळकोट तालुक्यातील १२९ गावांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या ४८० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असून सध्या काम वेगाने सुरू आहे. आतापर्यंत सुमारे ६५ टक्के काम पूर्ण झाले असून २०२६ पर्यंत योजना कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत मन्याड-बारूळ धरणातून पाणी उचलून संबंधित गावांना पुरवठा केला जाणार आहे. योजनेमध्ये १०४ किलोमीटर मुख्य जलवाहिनी तसेच ३९३ किलोमीटर अंतर्गत वितरण वाहिन्यांचे काम करण्यात येत आहे.
वाजरवाडा येथे ४१ दशलक्ष लिटर क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येत असून, उदगीर व जळकोट शहरासह परिसरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन ही योजना तयार करण्यात आली आहे.
माजी राज्यमंत्री तथा आमदार संजय बनसोडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या योजनेला गती मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. विविध तांत्रिक अडचणींवर मात करत काम पूर्णत्वाकडे नेण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहेत.
ही योजना पूर्ण झाल्यानंतर उदगीर-जळकोट परिसरातील १२९ गावांना मुबलक आणि शुद्ध पाणी उपलब्ध होणार असून, नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे.




