जळकोट तालुक्यातील दोरसागवी गाव आता संपूर्णपणे सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आले असून, गावाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ग्रामपंचायतीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. गावातील प्रमुख चौकांसह विविध भागांमध्ये अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
ग्रामविकास अधिकारी श्री. केशव शेवटे आणि सरपंच सौ. सोक्षा सोनकांबळे यांच्या अथक प्रयत्नांतून हा उपक्रम राबविण्यात आला. गावातील आण्णाभाऊ साठे चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक यांसारख्या प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून संपूर्ण गावावर लक्ष ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
या उपक्रमामुळे गावातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत होण्यास मदत होणार असून, चोरी, गैरप्रकार तसेच इतर अनुचित घटनांवर नियंत्रण ठेवणे सुलभ होणार आहे. ग्रामस्थांनीही या उपक्रमाचे स्वागत केले असून, समाजहिताचा आदर्श उपक्रम हाती घेतल्याबद्दल सरपंच सोक्षा सोनकांबळे, दिलीप सोनकांबळे, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामविकास अधिकारी केशव शेवटे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
गावाच्या सुरक्षिततेसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे दोरसागवी गावाचा परिसर अधिक सुरक्षित आणि सजग बनला आहे.





