संगमेश्वर कटके यांची प्रेरणादायी यशोगाथा
जळकोट शहरातील तरुण श्री. संगमेश्वर मुरलीधर कटके यांनी पुण्यातील नोकरी सोडून गावाकडे परत येत दुग्ध व्यवसायात यशस्वी वाटचाल सुरू केली असून, त्यांच्या जिद्द आणि मेहनतीची परिसरात मोठी चर्चा होत आहे.
काही वर्षांपासून पुण्यात नोकरी करणारे संगमेश्वर कटके यांनी “माणूस कितीही दूर गेला तरी त्याची नाळ मातीतच जोडलेली असते” हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे. शहरातील नोकरीपेक्षा स्वतःचा व्यवसाय उभारण्याचा निर्धार करत त्यांनी गावात दुग्ध व्यवसाय सुरू केला आणि आज ते दररोज सरासरी तीन हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवत आहेत.
सध्या त्यांच्या गोठ्यात जाफराबादी, मेसाणा, मुरा आदी जातींच्या सुमारे १२ म्हशी असून, दररोज ४० ते ५० लिटर दूध डेअरीला पुरवले जाते. संगमेश्वर कटके हे स्वतः जनावरांची देखभाल करतात. दूध काढण्यापासून चारा व्यवस्थापनापर्यंत सर्व कामे ते स्वतः मेहनत घेऊन करतात.
जनावरांच्या आरोग्यासाठी पोषक चारा, मिनरल मिक्सर पावडर तसेच योग्य आहार देऊन त्यांचे संगोपन केले जाते. त्यामुळे जनावरांची तब्येत चांगली राहून दुध उत्पादनातही वाढ होत असल्याचे त्यांनी सांगितले.
आर्थिक अडचणी, संघर्ष आणि खडतर प्रवासाचा सामना करत त्यांनी दुग्ध व्यवसायात यश मिळवले आहे. गावातील आणि बाहेरगावी रोजगारासाठी गेलेल्या तरुणांनी शेतीसोबत दुग्ध व्यवसायाकडे वळावे, असा संदेशही त्यांनी दिला.
संगमेश्वर कटके यांच्या या प्रेरणादायी यशोगाथेबद्दल जळकोट शहरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, सारथी महाराष्ट्राचा परिवाराकडूनही त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.




