रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १० वी) चा निकाल आज, गुरुवार ८ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. मंडळाचे सचिव दीपक माळी यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे.
पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेण्यात आली होती. २ मे रोजी बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता दहावीच्या निकालाकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले होते.
विद्यार्थ्यांना आज दुपारी १ वाजल्यापासून मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर विषयनिहाय गुण पाहता येणार असून, निकालाची प्रतही डाउनलोड करता येणार आहे.
ज्या विद्यार्थ्यांना गुणांची पडताळणी किंवा उत्तरपत्रिकेची छायाप्रत हवी असेल, त्यांच्यासाठी ९ मे ते २३ मे या कालावधीत ऑनलाईन अर्जाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. पुनर्मूल्यांकनासाठी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून, ती मिळाल्यानंतर पाच दिवसांच्या आत विहित शुल्कासह अर्ज करावा लागणार आहे.
येथे पाहता येईल निकाल :
🌐 www.mahresult.nic.in







