खटाव प्रतिनिधी :
खटाव तालुक्यातील वडगाव येथील पुरातन जयराम स्वामी मठात शासनाच्या पर्यटन विकास निधीतून मंजूर झालेल्या ४० लाख रुपयांच्या विकास कामाचा भूमिपूजन समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात तालुक्यातील शेती आणि पाणी प्रश्न पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला.
या कार्यक्रमाला आमदार मनोजदादा घोरपडे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सौ. प्रियाताई शिंदे, माजी आमदार डॉ. दिलीपराव बेळगावकर, धैर्यशील कदम, धनंजय चव्हाण, सौ. विद्या रामकृष्ण वेताळ, सी. एम. पाटील, मानसिंग मळवे, डॉ. प्रगती कोकाटे, सुनीता मगर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी माजी आमदार डॉ. दिलीपराव बेळगावकर यांनी आपल्या भाषणात भाजप सरकार तसेच पक्षाच्या माजी आमदारांच्या माध्यमातून विविध विकासकामे सुरू असल्याचे सांगितले. मात्र खटाव तालुक्याचा शेती पाणी प्रश्न अद्याप पूर्णपणे सुटलेला नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
त्यावर आमदार मनोजदादा घोरपडे यांनी पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट केले. उरमोडी योजनेचे पाणी पाइपलाईनच्या माध्यमातून तालुक्यातील छोट्या-मोठ्या पाझर तलावांमध्ये सोडण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्यात आला असून, त्या प्रस्तावाला मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी मंजुरी दिल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.









