नांदेड | प्रतिनिधी
खरीप पिक विमा 2025-26 अंतर्गत नांदेड जिल्ह्यासाठी एकूण 813.87 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला असून, सुमारे 4,34,828 शेतकरी लाभार्थी आहेत. सोयाबीन, तूर, कापूस, मूग आदी पिकांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. मात्र अद्याप किनवट व माहूर महसूल मंडळात पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
घोषणा होऊनही प्रत्यक्षात कोणतीही रक्कम मिळाली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, आणेवारीनुसारही नुकसान भरपाई जास्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असतानाही शासनाकडून मंजूर कोट्यवधी रुपयांची रक्कम अद्याप लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही.
शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत नुकसानीची नोंद केली असली तरी पीक विमा कंपन्यांकडून अद्याप अंतिम निर्णय व वितरण प्रक्रिया सुरू झालेली नाही. महसूल मंडळात लवकरच रक्कम जमा होईल अशी चर्चा सुरू असली तरी प्रत्यक्षात एक रुपयाही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही.
रब्बी हंगामातही अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्याने पंचनामे रखडले आहेत. त्यामुळे खरीप हंगामातील पीक विमा मिळालेला नाही आणि रब्बी हंगामाबाबतही अनिश्चितता कायम आहे.
“यंदाची नुकसान भरपाई तरी मिळणार का, की शेतकऱ्यांना अजून वाट पाहावी लागणार?” असा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये उपस्थित होत आहे.
शेतकऱ्यांचे लक्ष आता शासनाच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे.









