पाताळगंगा (खोपोली) | प्रतिनिधी
खालापूर तालुक्यासह परिसरात अचानक आलेल्या तुरळक अवकाळी पावसाने सुरू असलेल्या लग्नसराईवर मोठे संकट ओढवले आहे. विवाह सोहळ्यांदरम्यान पावसाने हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी उभारण्यात आलेले मंडप वाऱ्यामुळे हलू लागले, तर काही ठिकाणी नुकसान झाल्याचे दिसून आले.
लग्नसोहळ्यांसाठी उभारलेले मंडप, सजावटीचे साहित्य, ध्वनी व्यवस्था, खानपान साहित्य तसेच विद्युत उपकरणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आयोजक व वऱ्हाडी मंडळींची मोठी तारांबळ उडाली.
सध्या लग्न समारंभ सुरू असतानाच अचानक आलेल्या पावसामुळे पाहुण्यांच्या आनंदावर विरजण पडले. पावसासोबत आलेल्या वादळी वाऱ्यामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली. जवळपास १५ ते २० मिनिटे सुरू असलेल्या या पावसामुळे नवरा–नवरी आणि उपस्थितांचेही मोठे हाल झाले.
अचानक पाऊस सुरू झाल्याने जेवणाची व्यवस्था, पूजा विधी आणि बसण्याची व्यवस्था विस्कळीत झाली. मंडप डेकोरेटर्स आणि केटरिंग व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होत असल्याचे समोर येत आहे.
ग्रामीण भागात घरासमोर मंडप टाकून होणाऱ्या लग्नांना याचा सर्वाधिक फटका बसत असून, अनेकजण आता सुरक्षिततेच्या दृष्टीने विवाह हॉलकडे वळत असल्याचे दिसून येत आहे.









