कन्नड | प्रतिनिधी :
तालुक्यातील नरसिंगपूर येथील कृषी विभागाच्या आमराईचा लिलाव मोठ्या उत्साहात पार पडला असून यंदा या आमराईला तब्बल 13 लाख 25 हजार रुपयांचा उच्चांकी भाव मिळाला आहे. हा भाव आतापर्यंतचा सर्वाधिक असल्याचे सांगण्यात आले.
नरसिंगपूर येथील कृषी रोपवाटिकेत एकूण 170 रायबड जातीची आंब्याची झाडे असून त्यातील बहुतांश झाडांना मोठ्या प्रमाणात आंब्याचे लगड लागले आहेत. या फळबागेच्या लिलावात अनेक व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला होता.
लिलाव सिल्लोड येथील उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडला. सुरुवातीच्या अंदाजानुसार या आमराईला 18 ते 20 लाख रुपये मिळतील असा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र अखेरीस 13 लाख 25 हजार रुपयांची बोली लागली.
या लिलावात इस्माईल शेख यांनी सर्वाधिक बोली लावून ही आमराई खरेदी केली. मागील वर्षी फळधारणा कमी असल्याने केवळ 2 लाख 82 हजार रुपये इतकीच बोली लागली होती, मात्र यंदा उत्पादन वाढल्याने भावात मोठी वाढ दिसून आली.
हा लिलाव यशस्वी करण्यासाठी कृषी अधिकारी M.J. वाकळे, सहायक कृषी अधिकारी D.S. पगारे, बाबासाहेब दिवेकर, कृष्णा गुंजाळ, साईनाथ धनेधर यांनी विशेष परिश्रम घेतले.









