पुणे : प्रतिनिधी
अखिल भारतीय ग्राहक पंचायत, मध्य महाराष्ट्र प्रांताच्या वतीने एमआरपी (Maximum Retail Price) व्यवस्थेतील ग्राहकविरोधी त्रुटींविरोधात तसेच ग्राहक संरक्षणासाठी कायदेशीर सुधारणा करण्याच्या मागणीसाठी राज्यव्यापी निवेदन मोहीम व जनआंदोलन छेडण्यात येणार आहे.
सोमवार दि. ११ मे २०२६ रोजी सर्व जिल्हाध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा सचिव, तालुका अध्यक्ष व कार्यकर्त्यांनी आपल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रधानमंत्री, केंद्रीय वित्तमंत्री आणि ग्राहक व्यवहार मंत्री यांना निवेदन सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या आंदोलनात लक्षवेधी आंदोलन, सत्याग्रह, धरणे आंदोलन, घोषणाबाजी, पत्रकार परिषद तसेच जनजागृती अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली.
तालुकास्तरावरही तहसीलदारांना निवेदन देऊन एमआरपी विरोधातील जनजागृती प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
संघटनेच्या प्रमुख मागण्यांमध्ये प्रत्येक वस्तूवर उत्पादन खर्च छापणे, मनमानी एमआरपी बंद करणे, ग्राहकांसाठी न्याय्य किंमत निश्चित करणे, स्वतंत्र एमआरपी नियंत्रण प्राधिकरण स्थापन करणे आणि ग्राहकांची आर्थिक लूट थांबवणे यांचा समावेश आहे.
“ग्राहकांची लूट थांबवा”, “मनमानी MRP बंद करा”, “न्याय्य किंमत द्या” आणि “सशक्त ग्राहक – सक्षम भारत” अशी घोषवाक्ये देत ही व्यापक लोकचळवळ उभारण्यात येत असल्याचे प्रांताध्यक्ष बाळासाहेब सिताराम औटी यांनी सांगितले.
सर्व पदाधिकाऱ्यांनी शिस्तबद्ध व मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.








