उमरगा प्रतिनिधी | ०८ मे २०२६
परिस्थितीवर मात करण्याची जिद्द, कठोर परिश्रम आणि शिक्षणाची ओढ असेल तर यश नक्कीच मिळते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या दहावी (SSC) परीक्षेच्या निकालात उमरगा तालुक्यातील येणेगुर येथील कॅप्टन जोशी स्मारक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने घवघवीत यश संपादन करत ९५.७१ टक्के निकालाची नोंद केली आहे.
यंदाच्या निकालात मुलींनीच आपले वर्चस्व सिद्ध केले असून प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे तिन्ही क्रमांक मुलींनी पटकावले आहेत. विशेष म्हणजे, रिक्षाचालकाच्या कन्येने शाळेत प्रथम क्रमांक मिळवत आपल्या कुटुंबासह गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.
शाळेची गुणवंत विद्यार्थिनी कु. श्रावणी श्रीकांत कांबळे हिने ९०.२० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. अत्यंत सामान्य परिस्थितीत रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या वडिलांच्या कष्टाचे चीज करत श्रावणीने हे यश मिळवले आहे. तिच्या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
तसेच कु. आरती संजय लळे हिने ८९.२० टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक, तर कु. संजना आशिषकुमार कांबळे हिने ८८ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे.
यावर्षी शाळेतून एकूण ७१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेचा एकूण निकाल ९५.७१ टक्के लागला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशामुळे येणेगुर गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही यशोगाथा प्रेरणादायी ठरत आहे.









