विरार | प्रतिनिधी
विरार शहराच्या वाहतूक व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा बहुप्रतीक्षित नारंगी रेल्वे उड्डाणपूल अखेर नागरिकांच्या सेवेत दाखल झाला आहे. लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास आला असून, पुलाच्या लोकार्पणामुळे विरारकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून उभारण्यात आलेला हा पूल वाढत्या वाहतुकीचा ताण लक्षात घेऊन चार पदरी करण्यात आला आहे. सुरुवातीला दोन पदरी असलेल्या आराखड्यात बदल करून भविष्यातील गरजांचा विचार करत चौपदरी पुलाचा आग्रह लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी धरला होता. त्यासाठी तत्कालीन आमदार क्षितिज ठाकूर, माजी महापौर नारायण मानकर तसेच स्थायी समिती सभापती प्रवीण शेट्टी यांनीही प्रशासनाशी सातत्याने समन्वय साधला.
पुलाच्या विस्तारित आराखड्यामुळे कामाच्या कालावधीत वाढ झाली असली तरी नागरिकांच्या कायमस्वरूपी सोयीचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला होता. यापूर्वी विरार पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या एकमेव उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. अवघ्या काहीशे मीटरच्या अंतरासाठी नागरिकांना तासन्तास अडकून राहावे लागत होते. मात्र, नवीन चौपदरी पुलामुळे ही समस्या मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
पुलाच्या कामाची गुणवत्ता आणि सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी महापौर अजीव पाटील आणि सभागृह नेते प्रफुल्ल साने यांनी प्रत्यक्ष पाहणीही केली होती. तसेच जुन्या फाटकाजवळ नागरिकांसाठी कायमस्वरूपी भुयारी मार्ग उपलब्ध व्हावा, यासाठीही प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला होता.
अखेर सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून हा पूल नागरिकांसाठी खुला करण्यात आला असून, यामुळे विरारच्या वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार आहे. शहराच्या विकासाच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.









