मलकापूर (प्रतिनिधी): दि. 6 मे रोजी रात्री आलेल्या वादळी वाऱ्यामुळे मलकापूर तालुक्यातील काही भागात शेती पिकांसह सोलर कृषी पंपांचे नुकसान झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. काही ठिकाणी सोलर स्ट्रक्चरचे नुकसान होऊन पॅनल फुटल्याने कृषी पंप बंद पडले असून, त्यामुळे शेतकऱ्यांसमोर सिंचनाची अडचण निर्माण झाली आहे.
सोलर पंपावरच पाणीपुरवठा अवलंबून असल्याने पंप बंद पडल्याचा परिणाम पिकांवर होण्याची शक्यता आहे.
बेलाड येथील शेतकऱ्याचे नुकसान
तालुक्यातील बेलाड येथील शेतकरी सत्यभामा बाबुराव संबारे यांच्या शेतातील सोलर पंपाचे स्ट्रक्चरचे नुकसान होऊन एक पॅनल डॅमेज झाले आहे. त्यामुळे पंप कार्यरत नाही. तालुक्यातील अन्य काही शेतकऱ्यांचेही अशा प्रकारे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे.
विमा संरक्षण व दुरुस्तीची मागणी
PM कुसुम योजनेअंतर्गत बसवण्यात आलेल्या सोलर पंपांना 5 वर्षांचे विमा संरक्षण लागू आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान विमा कंपनीकडून भरून मिळणे अपेक्षित आहे.
सध्या खरीप हंगामाच्या पूर्वतयारीचे दिवस असल्याने, संबंधित विमा कंपनी व सोलर पुरवठादार कंपन्यांनी पंचनामा अहवाल प्राप्त होताच बाधित शेतकऱ्यांचे सोलर पंप तातडीने दुरुस्त करून कार्यान्वित करून द्यावेत, अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे.
महसूल व कृषी विभागाने नुकसानग्रस्त क्षेत्राची पाहणी करून पंचनामे पूर्ण करावेत व शासनाने बाधित शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.









