गडचिरोली/चंद्रपूर | प्रतिनिधी | दि. ८ मे
चंद्रपूरहून गडचिरोलीकडे जाणाऱ्या एका प्रवासी इलेक्ट्रिक बसला आज चंद्रपूर आणि मुल दरम्यान भीषण आग लागल्याची घटना घडली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील सर्व प्रवाशांना वेळेत बाहेर काढण्यात यश आले असून मोठी जीवितहानी टळली आहे. मात्र, या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर इलेक्ट्रिक बस चंद्रपूर बसस्थानकावरून गडचिरोलीकडे रवाना झाली होती. प्रवासादरम्यान चालकाच्या लक्षात बसमधून धूर निघत असल्याचे आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चालकाने तत्काळ बस रस्त्याच्या कडेला थांबवली आणि सर्व प्रवाशांना सुरक्षित खाली उतरवले. काही मिनिटांतच आगीने भीषण रूप धारण करत संपूर्ण बस आगीत भस्मसात झाली.
महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा
घटनेनंतर सुरक्षिततेच्या कारणास्तव चंद्रपूर-गडचिरोली महामार्गावरील वाहतूक काही काळ बंद करण्यात आली होती. त्यामुळे दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. भरउन्हात अडकलेल्या वाहनचालकांना आणि प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
आगीचे कारण अद्याप अस्पष्ट
आगीचे नेमके कारण अद्याप समोर आले नसले तरी शॉर्ट सर्किट किंवा बॅटरीमधील तांत्रिक बिघाडामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाने धाव घेत आग आटोक्यात आणली.
प्रवाशांची प्रतिक्रिया
“बसमध्ये अचानक धूर भरू लागला आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र चालकाने तत्काळ निर्णय घेत आम्हाला खाली उतरवले, त्यामुळे आज आम्ही सुरक्षित आहोत,” अशी प्रतिक्रिया एका प्रवाशाने दिली.
या घटनेनंतर इलेक्ट्रिक बसच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होत असून संबंधित विभागाने सखोल चौकशी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.








