राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांच्या संकल्पनेतून पत्रकारांना हक्काचे व्यासपीठ
प्रतिनिधी
निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त येत्या ५ जून रोजी श्रीक्षेत्र माहूर येथे भव्य पत्रकार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांसह निर्भय, निःपक्षपाती व जनहितासाठी कार्यरत पत्रकारांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे.
शहर आणि ग्रामीण भागात पत्रकारिता करताना पत्रकारांना अनेक अडचणी, दबाव व समाजकंटकांकडून त्रास सहन करावा लागतो. सामान्य नागरिकांच्या न्याय हक्कासाठी लढताना पत्रकारांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर पत्रकारांना एक सक्षम व्यासपीठ उपलब्ध व्हावे आणि त्यांच्या पाठीशी संघटितपणे उभे राहता यावे या उद्देशाने राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांच्या संकल्पनेतून ‘निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघ’ या संघटनेची स्थापना करण्यात आली.
वर्धापन दिनानिमित्त आयोजित या विशेष कार्यक्रमात उत्कृष्ट पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांसह सामाजिक, शैक्षणिक, कृषी, आरोग्य, क्रीडा, उद्योग, अध्यात्म, कायदेविषयक आणि इतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
यावेळी बोलताना राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांनी सांगितले की, “पत्रकार हा लोकशाहीचा खरा चौथा स्तंभ असून तो तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करतो. मात्र, अनेकदा पत्रकारांना अपेक्षित संरक्षण व सन्मान मिळत नाही. त्यामुळे पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी ही संघटना स्थापन करण्यात आली आहे.”
या वर्धापन दिन व सन्मान सोहळ्यास महाराष्ट्रातील सर्व पत्रकार बांधवांनी तसेच निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी व सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी माहूर येथे जय्यत तयारी सुरू असून पत्रकारांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.









