फुलसावंगी येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महा राजस्व समाधान शिबिर’ संपन्न; हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
फुलसावंगी | प्रतिनिधी
सामान्य नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी तहसील कार्यालयासह विविध शासकीय कार्यालयांच्या वारंवार फेऱ्या माराव्या लागतात. यात नागरिकांचा वेळ आणि पैसा मोठ्या प्रमाणात खर्च होतो. हा अनावश्यक त्रास कमी करून शासनाच्या सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात, या उद्देशाने राज्य शासनाच्या वतीने “छत्रपती शिवाजी महाराज महा राजस्व समाधान शिबिर अभियान” राबविण्यात येत असल्याचे प्रतिपादन महागावचे तहसीलदार अभय मस्के यांनी केले.
फुलसावंगी येथील जिल्हा परिषद उच्च विद्यालयात तहसील प्रशासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विशेष शिबिरात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे होते.
यावेळी उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे, आमदार वानखेडे, कुणाल नाईक, सारजाताई वाघमारे, सहायक पोलीस निरीक्षक अमोल राठोड तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
या शिबिरामध्ये महसूल, पंचायत समिती, कृषी, आरोग्य, सामाजिक न्याय, महावितरण, आधार नोंदणी, जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, निवासी दाखले, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना तसेच विविध शेतकरी योजनांबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. अनेक नागरिकांच्या अर्जांची तत्काळ नोंदणी करण्यात आली असून काही प्रकरणांचा जागेवरच निपटाराही करण्यात आला.
शिबिरात डिजिटल सेवांनाही विशेष प्राधान्य देण्यात आले. शासनाच्या ऑनलाइन सेवा, मोबाईल अॅप आणि “सेवोत्तम चॅटबॉट” याविषयी नागरिकांना सविस्तर माहिती देण्यात आली.
तसेच विविध महिला बचत गटांना कर्ज वितरण करण्यात आले. विविध शासकीय योजनांची प्रमाणपत्रे लाभार्थ्यांना वितरित करण्यात आली. फुलसावंगी आणि परिसरातील हजारो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेत उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला.










