दोंडाईचा | प्रतिनिधी
उत्तर महाराष्ट्रातील दोंडाईचा येथील युवा अभियंता आदित्य रविंद्र पाटील यांनी भारताच्या महत्त्वाकांक्षी ‘मिशन दृष्टि’ उपग्रह मोहिमेत सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून उल्लेखनीय योगदान देत दोंडाईचा शहराचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल केले आहे.
भारताच्या वेगाने प्रगती करणाऱ्या खाजगी अंतराळ क्षेत्रात मिशन दृष्टि ही ऐतिहासिक कामगिरी मानली जात आहे. बेंगळुरूस्थित स्पेस-टेक स्टार्टअपने विकसित केलेला हा उपग्रह जगातील पहिला OptoSAR (ऑप्टिकल + SAR) तंत्रज्ञानावर आधारित उपग्रह असून, त्यामध्ये इलेक्ट्रो-ऑप्टिकल आणि सिंथेटिक अपर्चर रडार (SAR) सेन्सर्सचा एकत्रित वापर करण्यात आला आहे. त्यामुळे हा उपग्रह कोणत्याही हवामानात तसेच दिवसा-रात्री अचूक माहिती संकलित करण्यास सक्षम ठरणार आहे.
हा उपग्रह पर्यावरणीय बदलांचे निरीक्षण, आपत्ती व्यवस्थापन, शेती, संरक्षण व्यवस्था आणि पायाभूत सुविधांवर लक्ष ठेवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. ढगाळ वातावरण, अंधार किंवा प्रतिकूल हवामानातही सातत्याने निरीक्षण करण्याची क्षमता असल्याने हा उपग्रह पारंपरिक प्रणालींपेक्षा अधिक प्रभावी मानला जात आहे.
या अत्याधुनिक मोहिमेत आदित्य पाटील यांनी सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे. उपग्रहाच्या डेटा प्रोसेसिंग, अचूक माहिती संकलन आणि प्रणाली कार्यक्षमतेत त्यांच्या योगदानामुळे मोठी भर पडली आहे. त्यांच्या या यशामुळे दोंडाईचा शहरासह संपूर्ण परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आदित्य पाटील हे रोटरी स्कूलच्या शिक्षिका उर्मिला पाटील आणि रोटरी सिनियर्सचे माजी अध्यक्ष रविंद्र सिताराम पाटील यांचे सुपुत्र आहेत. त्यांनी प्राथमिक शिक्षण दोंडाईचा येथे पूर्ण करून अभियांत्रिकी शिक्षण घेतले असून, सध्या ते एका नामांकित कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत. तंत्रज्ञान क्षेत्रातील त्यांची प्रगती आणि अभ्यासू वृत्तीमुळे ते युवा अभियंता म्हणून ओळखले जातात.
त्यांच्या या यशाबद्दल महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री ना. जयकुमार भाऊ रावल, उद्योगपती सरकार साहेब रावल, दोंडाईचा-वरवाडे नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा नयनकुंवर रावल, रोटरी सिनियर्सचे अध्यक्ष प्रविण महाजन, डॉ. मुकुंद सोहनी, राजेश मुणोत, सुरेश जैन, हिमांशु शाह यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी अभिनंदन केले आहे.
मिशन दृष्टि मोहिमेच्या यशामुळे भारताच्या खाजगी अंतराळ क्षेत्राला मोठी चालना मिळाली असून देशाच्या तांत्रिक क्षमतेचा जागतिक स्तरावर ठसा उमटला आहे. आदित्य पाटील यांसारख्या तरुण अभियंत्यांचे योगदान या यशामध्ये अत्यंत मोलाचे ठरत आहे.
✍️ श्री पांडुरंग शिंपी, प्रतिनिधी – दोंडाईचा









