पेरणोली केंद्रीय प्राथमिक शाळेचा शताब्दी महोत्सव दिमाखात संपन्न
आजरा
“ज्या शाळेत गुणवत्ता असते, तिथे पालक आपल्या पाल्याला शोधत येतात. पेरणोलीकरांचे विविध क्षेत्रांतील कार्य आदर्शवत आहे. शाळेला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मी सुसज्ज नवीन इमारत बांधून देण्याची ग्वाही देतो. मात्र, केवळ देखणी इमारत उभी राहून चालणार नाही, ती टिकवण्यासाठी आणि मराठी शाळा वाचवण्यासाठी पालकांनी आपली मुले मराठी शाळेतच पाठविण्याची जबाबदारी स्वीकारावी,” असे प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.
पेरणोली (ता. आजरा) येथील केंद्रीय प्राथमिक शाळेच्या शताब्दी महोत्सव व सन्मान सोहळ्याप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच वनश्री देसाई होत्या.
“शिक्षण केवळ नोकरीसाठी नसावे” – प्रा. डॉ. नंदकुमार मोरे
प्रमुख वक्ते प्रा. डॉ. नंदकुमार मोरे यांनी शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करताना सांगितले की, “स्वातंत्र्यपूर्व काळात राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून मुले शाळेत न पाठवणाऱ्या पालकांना दंडाची तरतूद केली होती. आज पालकांनी सरकारवर दोषारोप करण्याऐवजी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. प्राथमिक शिक्षणात मूलभूत बदल होणे आवश्यक असून केवळ नोकरी मिळवणे म्हणजे शिक्षण नव्हे, तर गाव आणि भूमीबद्दलचे भान जपणे हेच खऱ्या शिक्षणाचे यश आहे.”
मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्यास जिल्हा परिषद सदस्य सुधीर देसाई, सभापती जयश्री गाडे, उपसभापती यशोदा पोवार, सहायक गटविकास अधिकारी दिनेश शेटे, नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी वनश्री देसाई व तानाजी देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच उपसरपंच संकेत सावंत, राजेंद्र सावंत, अविनाश जोशीलकर, पांडुरंग लोंढे, संतोष जाधव, रावसाहेब देसाई, मुख्याध्यापक एकनाथ पाटील, विजय सारंग, बसवराज गुरव आदी उपस्थित होते.
नियोजनबद्ध आणि उत्साहपूर्ण सोहळा
कार्यक्रमाचे प्रास्ताविक काँ. संपत देसाई यांनी केले, तर संयोजन समितीचे अध्यक्ष उदयराज पवार यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. सूत्रसंचालन तानाजी पावले आणि संजय मोहीते यांनी केले. शेवटी उदय कोडक यांनी आभार मानले.
पेरणोली ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा शताब्दी महोत्सव अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाला.











