परभणी प्रतिनिधी :
परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील कोल्हावाडी परिसरातील यशवाडी पाटी येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वर शुक्रवारी दुपारी भीषण अपघात घडला. भरधाव एसटी बसने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परभणीहून बीडकडे जाणारी एसटी बस (क्रमांक MH 14 BT 1561) दुपारी सुमारे २ वाजता रवाना झाली होती. बस चालक अप्पासाहेब मिसाळ हे वाहन चालवत होते. दरम्यान, परतूर तालुक्यातील खांडीवाडी येथील अनिलराव लक्ष्मणराव जाधव (वय ५५) आणि त्यांची पत्नी आशापती अनिलराव जाधव (वय ५०) हे यशवाडी येथील मारुती मंदिराचे दर्शन घेऊन आपल्या गावाकडे परतत होते.
दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास यशवाडी पाटी येथे मागून येणाऱ्या वेगवान एसटी बसने त्यांच्या दुचाकीला (क्रमांक MH 20 FE 7568) जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकी एसटीच्या खाली अडकून सुमारे ४०० ते ४५० फूट अंतरापर्यंत फरफटत गेली. या भीषण अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर बस चालक अप्पासाहेब मिसाळ हा घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. अपघाताची माहिती मिळताच मानवत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बोरकर, पोलीस निरीक्षक प्रमोद देवकते, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक किशन पतंगे, उपनिरीक्षक अनिल खिल्लारे व इतर पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने दोन्ही मृतदेह कोल्हा प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणीसाठी हलवले असून, पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, महामार्गावरील वेगवान वाहनांवर नियंत्रण आणण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.










