आजरा : प्रतिनिधी
मुंबईहून गावी आलेल्या दाम्पत्याची मौल्यवान दागिने आणि रोकड असलेली बॅग आजरा पोलिसांच्या तत्परतेमुळे अवघ्या काही तासांत सुखरूप मिळून आली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल परिसरातून पोलिसांचे कौतुक होत आहे.
घटना अशी घडली
मुंबई येथे वास्तव्यास असलेले धनाजी बाबूराव कांबळे आणि त्यांची पत्नी संगीता कांबळे हे आपल्या मूळ गावी पेरनोली (ता. आजरा) येथे येण्यासाठी रविवारी सकाळी खासगी ट्रॅव्हल्सने आजरा येथे उतरले. घरी पोहोचल्यानंतर त्यांच्या सहा बॅगांपैकी एक बॅग हरवल्याचे लक्षात आले.
हरवलेल्या बॅगेमध्ये तब्बल १५ तोळे सोन्याचे दागिने, १ लाख रुपयांची रोकड आणि इतर मौल्यवान वस्तू होत्या. त्यामुळे घाबरलेल्या अवस्थेत कांबळे दाम्पत्याने आजरा पोलीस ठाण्यात धाव घेतली.
पोलिसांनी तातडीने सुरू केला शोध
सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार डोईजद यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून ट्रॅव्हल्सचा नंबर, वेळ आणि उतरलेले ठिकाण याची माहिती घेतली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार समीर कांबळे आणि पोलीस कर्मचारी वैभव गवळी यांना तातडीने शोधमोहीमेसाठी रवाना करण्यात आले.
आजरा शहरातील मुख्य चौक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. शोधमोहीम सुरू असताना एका दुकानाबाहेर सदर बॅग बेवारस अवस्थेत आढळून आली. तपासाअंती हा चोरीचा प्रकार नसून प्रवासातील गडबडीत बॅग तिथेच राहिल्याचे स्पष्ट झाले.
मौल्यवान ऐवज सुखरूप परत
पोलिसांनी बॅगेतील १५ तोळे सोने आणि १ लाख रुपयांची रोकड याची खात्री करून बॅग संगीता कांबळे यांच्या ताब्यात दिली. हरवलेली मौल्यवान बॅग सुखरूप मिळाल्याने कांबळे दाम्पत्य भावूक झाले आणि त्यांनी पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानले.
या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल बलु, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासो पवार आणि पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या मोहिमेत सपोनि शितलकुमार डोईजद, पीएसआय संजय पाटील, समीर कांबळे, सतीश जंगम, अनिल सरंबळे, वैभव गवळी आणि दिपाली खडके यांनी सहभाग घेतला.






