महिला सक्षमीकरण आणि सामाजिक कार्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्यांचा गौरव
वर्धा, दि. ९ : महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत महिला सक्षमीकरण, सामाजिक न्याय आणि बालसंरक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला व संस्थांना प्रदान करण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारांचे वितरण पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात सन २०२०-२१, २०२१-२२, २०२२-२३ आणि २०२३-२४ या चार वर्षांतील पुरस्कार विजेत्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपवनसंरक्षक हरवीर सिंग यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
सन २०२०-२१ चा पुरस्कार विजया विठ्ठलराव ढगे यांना प्रदान करण्यात आला. केंद्रप्रमुख म्हणून कार्यरत असताना त्यांनी विद्यार्थिनींना प्रोत्साहन देत बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य केले. तसेच बालिकांच्या उच्च शिक्षणासाठी प्रेरणा देण्याबरोबरच गावातील महिलांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठीही उल्लेखनीय योगदान दिले.
सन २०२१-२२ चा पुरस्कार जयश्री सुनिल कोटगीरवार यांना देण्यात आला. शिक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांनी ‘लेक शिकवा’ अभियानांतर्गत ‘मी सावित्री बोलतेय’ या एकपात्री नाट्यप्रयोगातून शिक्षणाबाबत जनजागृती केली. तसेच ‘लेक वाचवा’ आणि ‘तोची भोंदू ओळखावा’ यांसारख्या विषयांवरील लेखनातून सामाजिक प्रबोधन केले.
सन २०२२-२३ चा पुरस्कार छाया हरीभाऊ राडे यांना प्रदान करण्यात आला. त्यांनी ‘बेटी बचाव’, जीवनमूल्य शिक्षण, मासिक पाळीविषयक जागृती आणि आरोग्यविषयक उपक्रम राबवून महिलांमध्ये जागरूकता निर्माण केली. ‘हृदय स्पंदन’ उपक्रमांतर्गत त्यांनी ‘कविता माँ’, ‘नवी पालवी’, ‘महिलांचे साहित्यातील भागीदारी’ आणि ‘स्त्री मन आक्रोश’ यांसारख्या लेखनातून महिलांचे प्रश्न प्रभावीपणे मांडले.
सन २०२३-२४ चा पुरस्कार अनिता गणेश उगे यांना प्रदान करण्यात आला. मानधनी विषयतज्ज्ञ म्हणून कार्यरत असताना त्यांनी अल्पवयीन बालिकेवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात पुढाकार घेत आरोपीविरोधात स्वतः फिर्याद दाखल केली. त्यांच्या या धाडसी कार्याबद्दल जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, वर्धा यांच्या वतीने त्यांना ‘बालरक्षक’ म्हणूनही सन्मानित करण्यात आले आहे.
महिला व बालविकास विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारामध्ये दहा हजार रुपये रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, शाल, सन्मानपत्र आणि श्रीफळ असे स्वरूप आहे. कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.











