– पालकमंत्री डॉ. पंकज भोयर
बोर नदीवरील पूरसंरक्षण भिंतीचे भूमिपूजन
सेलू येथे तालुकास्तरीय जनसंवाद कार्यक्रम उत्साहात संपन्न
प्रतिनिधी :
वर्धा, दि. ९ (जिमाका) : शासनाच्या विविध योजना आणि उपक्रमांचा लाभ ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकांपर्यंत थेट पोहोचावा यासाठी जिल्हा, तालुका तसेच गावपातळीवर जनसंवाद कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.
सेलू तालुका प्रशासन आणि जलसंपदा विभागाच्या वतीने सेलू येथील शिवमंदिर परिसरात आयोजित जनसंवाद कार्यक्रम तसेच आपत्ती व्यवस्थापन व सौंदर्यीकरण अंतर्गत बोर नदीवरील पाच गावांमध्ये उभारण्यात येणाऱ्या संरक्षण भिंतीच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, माजी खासदार रामदास तडस, सेलू नगर पंचायत अध्यक्षा स्नेहल देवतारे, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष अशोक मुडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, अशोक कलोडे, ज्योती घंगारे, दामिनी डेकाटे, तहसीलदार शकुंतला पाराजे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता नितीनकुमार गुप्ता यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. भोयर म्हणाले की, जनसंवादाच्या माध्यमातून शासनाच्या योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत असून नागरिकांच्या समस्या आणि अडचणींचे निराकरण करण्यात मदत होत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांचा पंचायत समितीशी थेट संबंध येत असल्याने जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतीऐवजी नवीन पंचायत समिती इमारत उभारण्यात आली आहे. तसेच तहसील कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि तालुका कृषी कार्यालयाच्या नवीन इमारतींनाही मंजुरी मिळाली असून लवकरच बांधकामास सुरुवात होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
सेलू येथे ४५ कोटी रुपयांच्या खर्चातून तालुका न्यायालय उभारण्यात येणार असून ‘नमो उद्यान’ निर्मितीसाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच वर्धा येथे १०० एकर जागेवर नवीन कारागृह उभारण्याचा प्रस्ताव असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वर्धा आणि सेलू तालुक्याला पिण्याचे पाणी व सिंचनासाठी बोर आणि धाम प्रकल्पाचा मोठा लाभ होत असून या प्रकल्पांच्या कालव्यांच्या दुरुस्ती, क्षमता वाढ आणि नूतनीकरणासाठी प्रत्येकी १५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. बोर नदीवरील ब्राम्हणी, घोराड, सेलू, बेलगाव आणि देरडा येथे पूरसंरक्षण भिंती उभारण्यात येणार असून त्यामुळे पावसाळ्यात नदीकाठच्या गावांचे नुकसान कमी होण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.
माजी खासदार रामदास तडस यांनी जनसंवाद हा शासनाचा स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास होत असल्याचे मत व्यक्त केले. स्नेहल देवतारे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते ब्राम्हणी, घोराड, सेलू, बेलगाव आणि देरडा येथे सुमारे ५ कोटी ७० लाख रुपयांच्या खर्चातून उभारण्यात येणाऱ्या पूरसंरक्षण भिंतींचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर जनसंवाद कार्यक्रमात नागरिकांच्या तक्रारी आणि निवेदने स्वीकारून संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
यावेळी महसूल, कृषी, वन, आदिवासी विकास, महिला व बालविकास तसेच आरोग्य विभागाच्या विविध योजनांतील लाभार्थ्यांना लाभांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला विविध विभागांचे अधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.











