सावंगी (मेघे) येथे ३ कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन
२२ स्वतंत्र सेवा केंद्र इमारतींसाठी ४.३२ कोटींची तरतूद
वर्धा, दि. १० :
ग्रामीण भागातील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ पारदर्शक व जलद पद्धतीने मिळावा यासाठी उभारण्यात येणाऱ्या ‘आपले सरकार सेवा केंद्र’ इमारती महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.
सावंगी (मेघे) ग्रामपंचायत अंतर्गत सुमारे ३ कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते पार पडले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य उमेश जिंदे, ग्रामपंचायत प्रशासक संजय होटे, ग्रामपंचायत अधिकारी राहुल जुमडे, माजी सरपंच सरिता दौड, माजी उपसरपंच विलास दौड, पालोतीचे सरपंच श्री. खंडागळे, सालोडचे उपसरपंच आशिष कुचेवार, विशेष कार्यकारी अधिकारी राजू थुल आदी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. भोयर म्हणाले की, ग्रामीण भागातील नागरिकांना ऑनलाईन अर्ज व शासकीय सेवा मिळवण्यासाठी शहरात जाण्याची गरज भासू नये, यासाठी ‘आपले सरकार सेवा केंद्र’च्या स्वतंत्र इमारती उभारण्यात येत आहेत. या माध्यमातून नागरिकांची विविध कामे अधिक सुलभ आणि वेगाने मार्गी लागतील.
यावेळी त्यांनी माहिती दिली की, जिल्ह्यात एकूण २२ सुसज्ज सेवा केंद्र इमारतींसाठी ४ कोटी ३२ लाख ५४ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी सावंगी (मेघे) ग्रामपंचायतीने सर्वप्रथम इमारतीचे काम पूर्ण करून लोकार्पण केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच सावंगी जिल्हा परिषद शाळेची ‘आदर्श शाळा’ म्हणून निवड झाल्याची घोषणाही त्यांनी केली.
कार्यक्रमात ग्रामपंचायत भवन, ‘आपले सरकार सेवा केंद्र’ इमारत, सिमेंट रस्ते तसेच विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले. प्रारंभी ग्रामपंचायत प्रशासक संजय होटे व ग्रामपंचायत अधिकारी राहुल जुमडे यांनी पालकमंत्र्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. प्रास्ताविक माजी उपसरपंच विलास दौड यांनी केले.
यानंतर पालकमंत्री डॉ. भोयर यांनी ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधत विविध समस्यांबाबत निवेदने स्वीकारली. प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. कार्यक्रमास माजी ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, बचत गटातील महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
२२ गावांमध्ये उभारल्या जाणार सेवा केंद्र इमारती
पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या संकल्पनेतून वर्धा जिल्ह्यातील २२ ग्रामपंचायतींमध्ये सुसज्ज ‘आपले सरकार सेवा केंद्र’ इमारती उभारण्यात येणार आहेत. वर्धा तालुक्यातील नालवाडी, उमरी (मेघे), साटोडा, पवनार, आंजी (मो), पिपरी (मेघे), बोरगाव (मेघे), सिंदी (मेघे), सावंगी (मेघे), सालोड (हि), म्हसाळा, वरुड, वायगाव (निपाणी), सेवाग्राम, सेलू तालुक्यातील घोराड, केळझर, हिंगणी, देवळी तालुक्यातील नाचणगाव व गुंजखेडा, हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपूर व वडनेर तसेच समुद्रपूर तालुक्यातील गिरड या गावांचा यामध्ये समावेश आहे.
या प्रकल्पामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक सुलभ, पारदर्शक आणि वेगवान पद्धतीने उपलब्ध होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.











