नांदेड प्रतिनिधी :
किनवट येथे मुस्लिम समाजातील विवाह सोपे, सुटसुटीत आणि खर्चिक परंपरांना पर्याय देण्यासाठी आयोजित करण्यात आलेला १३ वा वाईज्तेमाई शादीयाँ सामूहिक विवाह सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
‘तन्जीम रहेनुमा-ए-कारवाँ’ संस्थेच्या वतीने ८ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता गोकुंदा रोडवरील एन. के. गार्डन येथे या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सामूहिक विवाह सोहळ्यात तब्बल २३ जोडपी निकाहबद्ध झाली.
प्रचंड महागाईच्या काळात विवाह समारंभांवरील वाढता खर्च टाळून गोरगरीब कुटुंबांना दिलासा मिळावा आणि समाजात एकोपा वाढावा, या उद्देशाने संस्था गेल्या १३ वर्षांपासून सातत्याने सामूहिक विवाहाचे आयोजन करत आहे. संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत ३५९ जोडप्यांचे विवाह यशस्वीरीत्या संपन्न झाले आहेत.
निकाह विधी मौलाना काझी शब्बीर यांनी ‘खूदबे-ए-निकाह’ वाचून शास्त्रोक्त पद्धतीने पार पाडले. सुप्रसिद्ध विचारवंत मुफ्ती तन्वीर यांनी नवविवाहित जोडप्यांना आणि उपस्थितांना मार्गदर्शन केले. सामूहिक दुआ (प्रार्थना) मुफ्ती साजीद व हाफिज शरफोद्दीन यांनी केली, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मौलाना सऑदत यांनी केले.
या कार्यक्रमाला आमदार भीमराव केराम, नगराध्यक्षा सुजाताताई एड्रलवार, शिवसेना जिल्हाप्रमुख ज्योतिबादादा खराटे, राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या बेबीताई प्रदीप नाईक, फेरोज दोसानी, ईसा खान, निसार खान, उपनगराध्यक्ष हसन खान पठाण, अभियंता प्रशांत ठमके, अरूण आळणे, के. मुर्ती, अजय सेठ नेम्मानिवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
सामाजिक बांधिलकी जपत मुस्लिम समाजात साधेपणाने विवाह सोहळे पार पाडण्याचा संदेश देणारा हा उपक्रम सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहे.











