दौंड | प्रतिनिधी –
भीषण उन्हाळ्यात केवळ माणसांनाच नव्हे तर मुक्या प्राणी-पक्षांनाही पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. हीच गरज ओळखून ‘एक मित्र एक वृक्ष’ ग्रुपच्या वतीने बारामती, दौंड, इंदापूर आणि अक्कलकोट या चार तालुक्यांतील वन्यजीवांसाठी पिण्याच्या पाण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
यंदा ग्रुपने तब्बल ५२ पाण्याचे टँकर सोडून गेल्या वर्षीचा स्वतःचाच विक्रम मोडला असून, या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पानवठे तुडुंब; वन्यजीवांना मोठा दिलासा
वन्य प्राणी आणि पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करणे हा अत्यंत संवेदनशील विषय असून, यावर्षी ‘एक मित्र एक वृक्ष’ ग्रुपने नियोजनबद्ध पद्धतीने हे कार्य राबवले. बारामती, दौंड, इंदापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील वन विभागाच्या परिसरातील विविध पाणवठे टँकरद्वारे भरून काढण्यात आले.
सध्या परिसरातील प्रमुख पाणवठे पूर्ण क्षमतेने भरले असून, तत्काळ नव्या पाण्याची गरज भासणार नसल्याची माहिती ग्रुपच्या वतीने देण्यात आली.
पुढील वर्षी आणखी व्यापक नियोजनाचा मानस
या सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याची अनेकांची इच्छा होती. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे सर्वांना सहभागी होता आले नाही. याबद्दल ग्रुपचे अध्यक्ष प्रशांत मुथा यांनी दिलगिरी व्यक्त करत, पुढील वर्षी इच्छुकांना प्राधान्य देऊन त्यांच्या माध्यमातून पहिले टँकर सोडले जातील, असे आश्वासन दिले.
“वन्यजीव आणि पक्ष्यांच्या संरक्षणासाठी ज्यांनी टँकरद्वारे मदत केली त्या सर्वांचे आम्ही ऋणी आहोत. आपल्या सहकार्यामुळे हजारो मुक्या जीवांची तहान भागली आहे. भविष्यात कुठेही पाण्याची तातडीची गरज भासल्यास ग्रुपच्या वतीने तात्काळ मदत केली जाईल,” असे प्रशांत मुथा यांनी सांगितले.
लोकसहभागातून जपली निसर्गसेवा
केवळ वृक्षारोपणापुरते मर्यादित न राहता निसर्गातील महत्त्वाचा घटक असलेल्या वन्यजीवांच्या अस्तित्वासाठी उचललेले हे पाऊल समाजात प्रेरणादायी ठरत आहे. या उपक्रमामुळे दुष्काळी भागातील हरणे, मोर तसेच इतर वन्य प्राण्यांना मोठा आधार मिळाला आहे.
“माणसाची तहान भागवणारे अनेक असतात; पण माळरानावरील मुक्या जीवांच्या घशाची कोरड ओळखतो तोच खरा निसर्गमित्र.”
“रणरणत्या उन्हात निसर्ग होरपळत असताना ‘एक मित्र एक वृक्ष’ ग्रुपसारखे हात माणुसकीची सावली बनून उभे राहतात.”
“तहानलेल्या पाखरांना पाण्याचा थेंब देणे हे जगातील सर्वात मोठे पुण्याचे कार्य आहे.”






