शेतकरी-शास्त्रज्ञ मंच सभेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, सेलसुरा यांच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाची सभा हिंगणघाट तालुक्यातील भगवा येथे प्रगतिशील शेतकरी बलराज श्योखंड यांच्या शेतावर उत्साहात पार पडली. बदलते हवामान, वाढते तापमान आणि शेतीसमोरील नव्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर पिक विविधता हा शाश्वत पर्याय असल्याचे प्रतिपादन वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. जीवन कतोरे यांनी केले.
या प्रसंगी शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाचे अध्यक्ष दिलीप पोहाणे, सदस्य इरफान अली, निलेश नाखले, सिंजेंटा फाउंडेशनचे भूषण गाडेगोणे, डॉ. भारती तिजारे, डॉ. सचिन मुळे तसेच डॉ. अंकिता अंगाईतकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. जीवन कतोरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, झाडांची लागवड केल्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते, कार्बन साठवणूक वाढते आणि हवामान बदलाच्या परिणामांना आळा बसतो. तसेच शेतात मित्र कीटक व पक्ष्यांचा वावर वाढून नैसर्गिक कीड नियंत्रणास मदत मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपारिक शेतीसोबत वृक्षआधारित शेती आणि पिक विविधतेचा अवलंब करणे आवश्यक आहे.
प्रगतिशील शेतकरी बलराज श्योखंड हे मूळ हरियाणा येथील असून गेल्या दहा वर्षांपासून भगवा येथे शेती करत आहेत. त्यांनी आपल्या शेतात कापूस व सोयाबीनऐवजी बांबू, निलगिरी आणि सरू या झाडांची लागवड करून एक वेगळा प्रयोग यशस्वी केला आहे. भविष्यात येथे अॅग्रो टुरिझम विकसित करण्याचाही त्यांचा मानस आहे.
शास्त्रज्ञांनी यावेळी विविध वृक्षांच्या फायद्यांबाबत माहिती दिली. बांबू हा अधिक ऑक्सिजन देणारा आणि कार्बन शोषून घेणारा वृक्ष असून पर्यावरण संवर्धनासाठी उपयुक्त आहे. निलगिरी कमी सुपीक किंवा पाणथळ जमिनीतही चांगली वाढते आणि कागद उद्योगासाठी उपयुक्त ठरते. तर सरूच्या मुळांवरील ‘फ्रँकिया’ जिवाणूमुळे जमिनीतील नत्र वाढून जमिनीचा पोत सुधारतो.
औद्योगिक क्षेत्रात बांबू आणि निलगिरीला वाढती मागणी असल्याने ही शेती आर्थिकदृष्ट्याही फायदेशीर ठरत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. शास्त्रज्ञांशी थेट संवाद आणि प्रत्यक्ष शेतभेटीमुळे उपस्थित शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अंकिता अंगाईतकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गजेंद्र मानकर, गणेश वायरे तसेच ग्रामस्थांनी सहकार्य केले.



