वर्धा प्रतिनिधी :
वर्धा शहर व जिल्ह्यात वाढत्या प्राणांतिक अपघातांना आळा घालण्यासाठी वर्धा पोलिसांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जिल्ह्यातील अपघातप्रवण ठिकाणी आता विशेष सूचना फलक लावण्यात आले असून वाहनचालकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.
दि. १३ मे २०२६ रोजी पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या आदेशानुसार सर्व पोलीस स्टेशन अधिकारी तसेच वाहतूक शाखेकडून ही मोहीम राबविण्यात आली. जिल्ह्यात ज्या ठिकाणी वारंवार गंभीर अपघात घडतात, अशा १९ ब्लॅक स्पॉट्सची ओळख पटवून त्या ठिकाणी “अपघात प्रवण स्थळ”, “वाहने हळू चालवा”, “सावध रहा” अशा सूचना देणारे फलक उभारण्यात आले आहेत.
या उपक्रमामागील उद्देश वाहनचालकांना धोकादायक ठिकाणी आधीच सतर्क करून अपघातांचे प्रमाण कमी करणे हा आहे. विशेषतः भरधाव वेग, निष्काळजीपणा आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी पोलिसांकडून जनजागृतीवर भर दिला जात आहे.
वाहतूक शाखेने सर्व वाहनचालकांना आवाहन केले आहे की, अपघातप्रवण स्थळांवर वाहनांचा वेग कमी ठेवावा, वाहतूक नियमांचे पालन करावे आणि सुरक्षित प्रवासाला प्राधान्य द्यावे. नागरिकांच्या सहकार्यामुळेच जिल्ह्यातील अपघातांचे प्रमाण कमी करण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, वर्धा यांनीही नागरिकांना सुरक्षित वाहनचालना करण्याचे आवाहन केले आहे.











