प्रतिनिधी : इंदापूर
इंदापूर तालुक्यात गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून सुरू असलेल्या सततच्या वीज खंडित होण्याच्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसातून तब्बल ६ ते १० वेळा वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
तालुक्यातील अनेक भागांत वीज कधी येईल आणि कधी जाईल याचा कोणताही ठराविक वेळ नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. वाढत्या उष्णतेमध्ये तासन्तास वीज नसल्याने लहान मुले, वृद्ध नागरिक, आजारी व्यक्ती तसेच महिला यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असून शेतकऱ्यांची पिकांना पाणी देण्याची व्यवस्था देखील कोलमडली आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित वीज वितरण विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. अधिकाऱ्यांकडून केवळ आश्वासने दिली जात असून प्रत्यक्षात परिस्थितीत कोणतीही सुधारणा होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
यासोबतच सत्ताधारी लोकप्रतिनिधी देखील या गंभीर प्रश्नावर मौन बाळगत असल्याने जनतेत नाराजी वाढत आहे. “जनतेच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष केले जात आहे,” अशा तीव्र प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.
दरम्यान, वीजपुरवठ्याची समस्या तातडीने सोडवली नाही तर नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. इंदापूर तालुक्यात नियमित व अखंडित वीजपुरवठा सुरू करण्यासाठी प्रशासनाने त्वरित हस्तक्षेप करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.










