आंबेसांगवी प्रतिनिधी :
इयत्ता दहावीच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात श्री शिवाजी विद्यालय, सोनखेड येथील विद्यार्थी श्रीराज माधवराव सावंत (आंबेसांगवीकर) याने तब्बल ९९ टक्के गुण मिळवत लोहा व कंधार तालुक्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. त्याच्या या यशामुळे विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
श्रीराजने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, नातेवाईक तसेच गुरुजनांना दिले आहे. त्याच्या या उल्लेखनीय यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विद्यालयातून धनश्री दिगांबर कदम हिने ९१.८० टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक पटकावला, तर आशिष गणेशराव मोरे याने ८९ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष प्रा. डॉ. पुरुषोत्तम धोंडगे, सचिव भाई गुरुनाथराव कुरुडे, सहसचिव अॅड. मुक्तेश्वर धोंडगे तसेच संस्थेचे पदाधिकारी यांनी अभिनंदन केले. शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष बाबाराव देशमुख, प्राचार्य तथा मुख्याध्यापक बी. के. पवळे, उपमुख्याध्यापक एम. बी. वानखेडे, उपप्राचार्य ए. एन. वरपडे, पर्यवेक्षक व्ही. एस. चिवळे, बी. डी. बरडे, के. बी. देशमुख तसेच विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
यावेळी श्रीराज व त्याच्या आई-वडिलांचा घरी जाऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी मुख्याध्यापक भगवान पवळे, सहशिक्षक डी. बी. मरशिवणे, एस. बी. येमेकर, आर. एस. वळसे, बी. व्ही. अकमवार, व्ही. एन. स्वामी आदी उपस्थित होते.










