सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर : कांद्याला मिळत असलेल्या अत्यल्प दरामुळे शेतकरी वर्ग हतबल झाला असून, उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या लिलावात केवळ ५० पैसे ते ४ रुपये किलोपर्यंत भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
चंद्रकांत गायकवाड यांनी स्वतःचा कांदा विक्रीसाठी सोलापूर मार्केटमध्ये आणला असता त्यांना अत्यंत कमी दर मिळाल्याचा अनुभव आला. त्यांनी तब्बल १८२ पाट्या कांदा बाजारात विक्रीसाठी आणला होता. त्यामध्ये पहिल्या दर्जाच्या कांद्याला २ रुपये २५ पैसे प्रतिकिलो, दुसऱ्या दर्जाच्या कांद्याला १ रुपया प्रतिकिलो तर तिसऱ्या दर्जाच्या कांद्याला केवळ ५० पैसे प्रतिकिलो असा दर मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या मते, एक एकर कांदा पिकवण्यासाठी किमान ४० ते ५० हजार रुपये खर्च येतो. मात्र बाजारात मिळणारा दर अत्यंत कमी असल्याने उत्पादन खर्च तर दूरच, वाहतूक खर्चही निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
“अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसमोर आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय उरत नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करत आहेत. केंद्र व राज्य शासनाने तातडीने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्यावे तसेच कांद्याला हमीभाव देऊन नुकसान भरपाई जाहीर करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.









