संभाव्य गावांतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; जि. प. सदस्य विराज नाईक यांनी तहसीलदारांना दिले निवेदन
शिराळा | प्रतिनिधी
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कॉरिडॉर विस्ताराबाबत नागरिकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी तातडीची बैठक बोलवावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य विराज नाईक यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी संभाव्य कॉरिडॉर क्षेत्रातील गावांतील प्रमुख नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कॉरिडॉर विस्तारासंदर्भातील बातम्या विविध वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या ९३ गावांऐवजी कॉरिडॉर क्षेत्राचा विस्तार ५५० गावांपर्यंत करण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती समोर येत आहे. यात शिराळा तालुक्यातील अनेक गावांचा समावेश होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
या प्रस्तावामुळे संबंधित गावांमध्ये विकासकामांवर निर्बंध येण्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत. विशेषतः रस्ते बांधणी, वीजपुरवठा, नवीन उद्योग, सिमेंट रस्ते, पक्की बांधकामे तसेच शेतीपूरक व्यवसायांवर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे तालुक्याच्या आर्थिक आणि व्यावसायिक प्रगतीला अडथळा निर्माण होण्याची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
नागरिकांना अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नसल्याने संभ्रम वाढत असून, या प्रस्तावात नेमकी कोणती गावे समाविष्ट आहेत, स्थानिकांच्या उपजीविकेवर याचा काय परिणाम होईल, तसेच विकासकामांवर नेमके कोणते निर्बंध येणार, याबाबत स्पष्टता नसल्याचे सांगण्यात आले.
त्यामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तुषार चव्हाण, विभागीय वनाधिकारी स्नेहलता पाटील, सहाय्यक वनसंरक्षक संदेश पाटील, चांदोली वनपरिक्षेत्र अधिकारी ऋषिकेश पाटील तसेच संभाव्य गावांतील प्रमुख नागरिकांची संयुक्त बैठक तातडीने आयोजित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बी. के. नायकवडी, विश्वासचे संचालक संभाजी पाटील, शिवाजी पाटील, सुहास घोडे-पाटील, तानाजी वनारे, कोंडीबा चौगुले, शंकर मोहिते, पै. शिवाजी लाड, सुरेश चिंचोलकर, बाबासो गोळे, डॉ. तानाजी पाटील, विजय पाटील, वसंतराव भाडुगळे, ॲड. महेश शेडगे, सुनील हाप्पे, युवराज हाप्पे, अमोल कांबळे, राजू खांडेकर आदी उपस्थित होते.
बैठकीत चर्चेसाठी प्रमुख मुद्दे :
- व्याघ्र कॉरिडॉर प्रस्तावात शिराळा तालुक्यातील नेमकी कोणती गावे समाविष्ट आहेत?
- प्रस्तावामुळे विकासकामे आणि व्यवसायांवर कोणते निर्बंध येणार?
- स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर काय परिणाम होणार?
- भविष्यातील उद्योग, व्यवसाय आणि परवानग्यांवर अडचणी निर्माण होणार का?









