जेजुरी येथे उड्डाणपूल उभारणार; फलटणच्या रस्त्यांसाठी ९७ कोटींची तरतूद
सुरवडी | प्रतिनिधी
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री Nitin Gadkari यांनी आळंदी-पंढरपूर पालखी महामार्ग (NH-965) प्रकल्पाची पाहणी करून प्रकल्पाचे तब्बल ८० टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती दिली. फलटण तालुक्यातील सुरवडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी गडकरी यांनी सांगितले की, दिवे घाटातील अरुंद रस्त्यामुळे निर्माण होणारी वाहतुकीची समस्या आता दूर झाली असून घाटातील रस्त्याचे रुंदीकरण पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित काम डिसेंबर २०२६ अखेरपर्यंत पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जेजुरी येथील बायपासला स्थानिक नागरिकांकडून होत असलेल्या विरोधाची दखल घेत त्या ठिकाणी ‘फ्लाय ओव्हर’ अर्थात उड्डाणपूल उभारण्याची महत्त्वपूर्ण घोषणा त्यांनी केली. तसेच फलटण तालुक्यातील विविध रस्ते विकास कामांसाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विनंतीनुसार ९७ कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
पालखी महामार्ग हा केवळ धार्मिक श्रद्धेचा विषय नसून पर्यावरणपूरक विकासाचा आदर्श ठरेल, असे सांगताना गडकरी म्हणाले की, या मार्गावर ४६ तलावांची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच ४० हजार नवीन झाडांची लागवड करण्यात आली असून ४५० जुन्या झाडांचे यशस्वी पुनरोपण करण्यात आले आहे.
वाढते प्रदूषण लक्षात घेता हा महामार्ग ‘ग्रीन हायवे’ म्हणून विकसित करण्यासाठी स्थानिक संस्था आणि लोकप्रतिनिधींनी झाडांचे संगोपन करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
“पालखी मार्गामुळे पर्यटन वाढेल, रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीला चालना मिळेल,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या पत्रकार परिषदेस Dhairyasheel Mohite Patil, Sachin Patil, Abhijit Patil, नगराध्यक्ष समशेर दादा निंबाळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.



