अन्याय निवारण समिती व नगरसेवकांचा आक्रमक पवित्रा; ठोस पावले न उचलल्यास जनआंदोलनाचा इशारा
आजरा | प्रतिनिधी
आजरा शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वारंवारच्या वीज खंडित होण्याच्या समस्येवर अखेर तोडगा निघण्याची चिन्हे दिसत आहेत. “पुढील १५ दिवसांच्या आत पर्यायी दुसऱ्या विद्युत लाईनची व्यवस्था करण्यात येईल,” असे लेखी आश्वासन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे. अन्याय निवारण समिती, स्थानिक नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयावर धडक देऊन अधिकाऱ्यांना जाब विचारल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
सलग दोन रात्री शहर अंधारात
दिनांक १२ आणि १३ मे २०२६ रोजी सलग दोन रात्री आजरा शहराचा वीजपुरवठा खंडित झाला होता. ऐन उन्हाळ्यात रात्रीच्या वेळी वीज नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष तथा नगरसेवक परशुराम बामणे (भाऊजी) यांनी पुढाकार घेत १४ मे रोजी सकाळी महावितरण कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली.
अधिकाऱ्यांना नागरिकांचा जाब
बैठकीत नगरसेवक बाळ केसरकर आणि किरण कांबळे यांनी प्रशासकीय दिरंगाईबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. सामाजिक कार्यकर्ते नौशाद बुडेखान यांनी “रात्रभर वीज नसल्यास वयोवृद्ध नागरिकांनी कसे जगायचे?” असा प्रश्न उपस्थित केला. तर प्रकाश सावंत यांनी “तालुका बिल वसुलीत प्रथम क्रमांकावर असताना केवळ आजरा शहराचीच वीज वारंवार का जाते?” असा सवाल उपस्थित करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
१२ वर्षांपासून प्रलंबित प्रश्न ऐरणीवर
चर्चेदरम्यान मलिग्रे येथे १२ वर्षांपूर्वी उभारण्यात आलेले पर्यायी सबस्टेशन अद्याप तांत्रिक कारणांमुळे बंद असल्याची माहिती समोर आली. नगरसेवक परशुराम बामणे यांनी इशारा देत सांगितले की, “येत्या १५ दिवसांत पर्यायी वीजपुरवठा सुरू झाला नाही तर हजारो नागरिकांसह तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.”
महावितरणचे आश्वासन
महावितरणचे उपकार्यकारी अभियंता (प्रभारी) नागेश बसरकट्टी, सहाय्यक अभियंता कृष्णात कोळी आणि वायरमन संतोष डोंगरे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून मलिग्रे सबस्टेशनची तातडीने दुरुस्ती करण्यात येईल, तसेच वीजवाहिन्यांवरील झाडांची छाटणी करून १५ दिवसांत पर्यायी व्यवस्था सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
बैठकीस उपस्थित मान्यवर
या बैठकीस नगरसेवक सोनेखान, गौरव देशपांडे (उपाध्यक्ष, अन्याय निवारण समिती), जोतिबा आजगेकर, मिनीन डिसोझा, अतुल पाटील, दिनकर जाधव, शरीफ खेडेकर, मुनीर माणगावकर, सफवान काकतीकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.











