शहादा, दि.१३ (प्रतिनिधी)
राजकीय हव्यासापोटी दिशाहीन होत चाललेल्या युवाशक्तीला सामाजिक परिवर्तनाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच श्रमिक, कष्टकरी आणि आदिवासी चळवळीची पुढील दिशा ठरवण्यासाठी दिनांक २१ मे २०२६ रोजी श्रीखेड (ता. शहादा) येथे विशेष कार्यकर्ता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या बैठकीत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा लोककवी वाहरू सोनवणे हे कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधून मार्गदर्शन करणार आहेत. शिव, शाहू, फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीने प्रेरित कार्यकर्त्यांसाठी ही बैठक वैचारिक पर्वणी ठरणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.
आयुष्याची अनेक वर्षे सामाजिक चळवळीत व्यतीत केलेल्या वाहरू सोनवणे यांचा अनुभव नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या बैठकीतून होणार आहे. युवाशक्ती ही केवळ राजकीय साधन न राहता सामाजिक परिवर्तनाची निर्णायक शक्ती म्हणून उभी राहावी, हा या बैठकीमागील मुख्य उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
बैठकीदरम्यान विद्रोही विचार आणि जनसामान्यांच्या वेदना मांडणाऱ्या कविता व गायनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे. अन्यायाविरोधात शब्दांच्या माध्यमातून आवाज उठवणाऱ्या कलावंतांचा सहभाग हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरणार आहे.
ही बैठक २१ मे रोजी सायंकाळी ७ वाजता श्रीखेड येथे पार पडणार असून, बैठकीनंतर उपस्थित कार्यकर्त्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
अन्नाचा अपव्यय टाळण्यासाठी उपस्थित राहणाऱ्या कार्यकर्त्यांनी आयोजकांना भ्रमणध्वनीद्वारे आपली उपस्थिती पूर्वकल्पित कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
“रात्र आपली आहे; पण येणाऱ्या काळ्या रात्रींना थोपवण्यासाठी दिशादर्शक दीपस्तंभाची गरज आहे,” या विचाराने प्रेरित होऊन जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन विद्रोही साहित्यिक दादाभाई पिंपळे यांनी केले आहे.








